जत तालुक्याची इत्यंभूत माहिती

काय आहे जत ? कोठे आहे जत भाग ? महाराष्ट्रात असूनही कानडी लोक का आढळतात इथे ? पश्चिम महाराष्ट्रातला सर्वात मागासलेपणाचे दु:ख का आलेय जतच्या नशिबी ? पावसाचे प्रमाण किती आणि कसे आहे ? इथे पडणारया पावसाच्या पाण्याचा थेंब कोठे जातोय ? पाणी नाही हे इतकेच कारण आहे ? का आणखी काही ? काय करतेय महाराष्ट्र शासन ? जत तालुक्याची इत्यंभूत माहिती पहा फक्त http://jalyuktjat.blogspot.in/ या ब्लॉग वर

Thursday 23 May 2013

लोकसहभागातून जलयुक्त गाव अभियान यशस्वी करु - दीपेंद्रसिंह कुशवाह


लोकसहभागातून जलयुक्त गाव अभियान यशस्वी करु - दीपेंद्रसिंह कुशवाह
सांगली : जत तालुका हा दुष्काळी तालुका आहे. या तालुक्यात गेल्या तीन वर्षांपासून सतत दुष्काळ पडत आहे. तालुक्याच्या जमिनीतील पाण्याची पातळी वाढविण्यासाठी गावागावांतील पाण्याचा साठा वाढविण्यासाठी आयुक्त प्रभाकर देशमुख यांच्या संकल्पनेतून जलयुक्त गाव अभियान हा उपक्रम हाती घेण्यात आला असून लोकसहभागातून जलयुक्त गाव अभियान निश्चित यशस्वी करण्यात येईल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी केले.

दुष्काळी भागातील तालुक्यांमध्ये राबविण्यात येणाऱ्या विविध अभियानाची माहिती पत्रकारांना देताना श्री. कुशवाह बोलत होते.

ते म्हणाले, जलयुक्त गाव अभियान राबविताना जिल्ह्यात जत, आटपाडी, शिराळा, वाळवा या तालुक्यांनी उत्तम काम केले आहे. दुष्काळी तालुक्याच्या बंधाऱ्यातील गाळ जरी काढला तरी मोठ्या प्रमाणात पाणी थांबवून गावोगावची पाण्याची पातळी वाढवू शकतो याची खूणगाठ पटल्यानंतर विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी योजना दुष्काळी तालुक्यात राबविण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार सांगली जिल्ह्यातही हे अभियान राबविण्यास सुरुवात केली आहे.

जत तालुक्याविषयी बोलताना श्री. कुशवाह म्हणाले, ही योजना या तालुक्यात जोरात सुरू आहे. परिविक्षाधीन जिल्हाधिकारी देवेंद्रसिंह व तहसिलदार आप्पासाहेब समिंदरे यांनी तालुक्यातील कृषी अधिकारी, सहायक निबंधक, उपअभियंता (खोपा), पंचायत समिती यांच्या सहकार्याने महात्मा फुले जल व भूमी अभियानांतर्गत 15 एप्रिल 2013 पासून तालुक्यातील सिमेंट नाला बांध, पाझर तलाव, लघुसिंचन तलावामधील एकूण 45 ठिकाणचा गाळ काढला आहे. या तलावातून जवळजवळ 2.5 दशलक्ष घनमीटर गाळ काढला असून ऑगस्ट 2012 मध्ये सिमेंट, नालाबांधमधून व पाच लघुपाटबंधारे तलावामधून 1.5 दशलक्ष घन मीटर गाळ काढण्यात आलेला आहे. याशिवाय तालुक्यातील एकूण 64 सिमेंट नालाबांधमधून, 6 पाझर तलावातून आणि 11 लघुपाटबंधारे तलावातून एकूण 81 ठिकाणांवरुन 400 दशलक्ष घनमीटर गाळ लोकसहभागातून काढला आहे, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी जत तालुक्याचे परिविक्षाधीन जिल्हाधिकारी देवेंद्रसिंह यांनी प्रसारमाध्यमांव्दारे जत तालुक्यातील गावकऱ्यांना आवाहन केले की, प्रशासनाने तालुक्यातील 100 ठिकाणचा गाळ काढण्याचे उद्दिष्ट आखले असून त्यानुसार नियोजन केले जात आहे. तरी गावकऱ्यांनी व प्रशासनाने मिळून जलयुक्त गाव अभियान यशस्वी करावे.

No comments:

Post a Comment